India's LPG Productions : मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' बंद होण्याच्या भीतीमुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचे थेट पडसाद आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उमटू लागले आहेत. कमर्शियल एलपीजीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे मुंबईतील तब्बल २० टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारने पुरवठा साखळी टिकवून ठेवण्यासाठी 'जीवनावश्यक वस्तू कायदा' लागू केला आहे.
भारताचे एलपीजी गणित कसे आहे.
भारताची एलपीजीवरील अवलंबित्व मोठी असून आकडेवारी धक्कादायक आहे.
- एकूण वापर : देशात दरवर्षी सुमारे ३.२ कोटी टन एलपीजीचा वापर होतो.
- आयात : एकूण गरजेपैकी तब्बल ६०% गॅस आयात केला जातो.
- देशांतर्गत उत्पादन : केवळ ४०% (१२.४ दशलक्ष टन) गॅसचे उत्पादन भारतात होते.
- वापरकर्ते : देशात सध्या ३३.०८ कोटी सक्रिय एलपीजी ग्राहक आहेत.
आपण 'या' देशांवर अवलंबून!
भारताच्या एकूण गॅस आयातीमध्ये पश्चिम आशियाचा वाटा सिंहाचा (८०%) आहे. त्यामुळे या भागातील युद्धाचा भारताला मोठा फटका बसत आहे.
संयुक्त अरब अमिराती : २६% पुरवठा.
कतार : २२% पुरवठा.
सौदी अरेबिया : २२% पुरवठा.
इतर देश : ३३% पुरवठा.
वाचा - कच्च्या तेलापासून ते तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत; असा तयार होतो 'LPG' गॅस!
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
७ मार्च रोजी सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केल्याने दिल्लीत गॅस ९१३ रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या १०.५ कोटी लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर ३०० रुपये सबसिडी मिळत असल्याने, त्यांना एका सिलिंडरसाठी ६१३ रुपये मोजावे लागत आहेत. सरकारने घरगुती गॅस टंचाई टाळण्यासाठी व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल आहे. याचा परिणाम हॉटेलपासून अनेक उद्योगांवर झाला आहे.
